नवी दिल्ली : जून महिन्यामध्ये भाविकांचे श्रद्धास्थान असणारी अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. ३० जूनला ही यात्रा सुरु होणार आहे. मात्र, या यात्रेवर दहशतवादाचे सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना TRF ने पत्राद्वारे धमकी दिली आहे. या पत्रातून TRF ने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दहशतवादी संघटना ‘द रेजिस्टेंस फ्रंट ‘पत्राद्वारे धमकी दिली आहे. टीआरएफने लिहिलेल्या पत्रात, “आम्ही अमरनाथ यात्रेच्याविरोधात नाही. काश्मीरमध्ये येणाऱ्या भाविकांच्याही विरोधात नाही. मात्र, अमरनाथ यात्रेचा वापर हा केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी करणार असल्याचे आमच्या लक्षात आले आहे”.
अमरनाथ यात्रेसाठी 15,000 ते 8 लाख यात्रेकरूंची नोंदणी ही 15 दिवसांपासून ते 80 दिवसांपर्यंत करण्यात येत आहे. याद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्वयंसेवकांना काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्यासाठी पाठवत असल्याचा दावा या दहशतवादी संघटनेने केला आहे.
आम्ही कोणत्याही धार्मिक यात्रेच्या विरोधात नाही. मात्र, धार्मिक यात्रांचा वापर काश्मीरमधील संघर्षाविरोधात होत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आहोत, असेही टीआरएफने म्हटले आहे. राजकीय फायद्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून त्याला विरोध करणार असल्याचे टीआरएफने म्हटले. अमरनाथ यात्रेसाठी येणारे भाविक सुरक्षित राहतील. मात्र, त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांना मदत, आश्रय देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील अशीही धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. टीआरएफ ही संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.