भोपाळ : मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. एका बस आणि ऑटो रिक्षाची धडक झाली असून यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहे. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. मंगळवारी सकाळी शहरातील जुनी छावणी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला. अतिरिक्त पोलीस निरीक्षकांनी या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रु.तर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाचा चालक आणि रिक्षामधील नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याची माहितीसमोर येत आहे. पोलीस निरिक्षक असणाऱ्या रवी भदोरिया यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. रिक्षामध्ये प्रामुख्याने महिला प्रवासी होत्या. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या मोरीनाकडे निघालेल्या बसने रिक्षाला समोरुन धडक दिली. मरण पावलेल्या माहिलांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत असल्याचं भदोरिया यांनी म्हटलं आहे.
ग्वालियर में बस और ऑटो में टक्कर से हुए भीषण हादसे में कई अनमोल जिंदगियों के असमय काल कवलित होने से बहुत दुःख पहुंचा है।
ईश्वर से दिवंगत आत्माओं को अपने श्री चरणों में स्थान और परिजनों को यह वज्रपात सहन करने की शक्ति देने की प्रार्थना करता हूं। ॐ शांति!
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 23, 2021
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विटरवरुन घडलेल्या अपघाताबद्दल खेद व्यक्त केला आहे. “ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाची धडक झाल्याने घडलेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली. मी इश्वराकडे प्रार्थना करतो की या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच या मृतांच्या नातेवाईकांना हा धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो,” असं ट्विट चौहान यांनी केलं आहे.
“मी आणि मध्य प्रदेशमधील जनता या दु:खद प्रसंगी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. त्यांनी स्वत:ला एकटं समजू नये. मध्य प्रदेश सरकारच्यावतीने मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाखांची तर जखमींना मदतनिधी म्हणून ५० हजार रुपयांची मदत केली जाईल,” अशी माहितीही चौहान यांनी दिली. हा अपघात नेमका कसा झाला यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.