अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव
पिंपरी – राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली. मात्र, पुणे आणि आसपासच्या परिसरात एप्रिल ते मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. या काळात परीक्षा घेतल्याने येथील विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहे. विशेष म्हणजे, बोर्डाकडून देण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रांवर सोयी-सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांनी पेपर सोडवताना उकाड्याचाही सामना करावा लागणार आहे.
मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असते. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढतो. पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा 38 ते 39 अंशाच्या वर जातो. दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान होत असते. तसेच 3 ते 23 मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येते. मात्र, गेल्यावर्षी करोनामुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. यानंतर पेपर घेता न आल्याने त्याचे गुण अन्य पेपरच्या मूल्यांकनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना देण्यात आले. हा अनुभव बघता, यावर्षी 23 एप्रिल ते 21 मेदरम्यान बारावी तर 29 एप्रिल ते 20 मेदरम्यान दहावीचे पेपर घेण्यात येणार आहे.
दहावीच्या परीक्षेकरिता 2019 मध्ये 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थी बसले होते. तर गेल्यावर्षी 2020 मध्ये 17 लाख 9 हजार 264 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 15 लाख 5 हजार 27 जणांनी बारावीची परीक्षा दिली होती. याही वर्षी जवळपास तेवढेच विद्यार्थी परीक्षा देतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, काही परीक्षा केंद्र वगळता, बाकीच्या केंद्रांवर फॅन आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी पेपर सोडवायचा कसा असा प्रश्न निर्माण होणार आहे.
यंदाही उन्हाळा तापणार
हवामान विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे आणि आसपासच्या परिसरात कडक उन्हाचे संकेत दिले आहेत. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा जबर तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा आतापर्यंतचा इतिहास बघितल्यास मे महिन्यात कमाल तापमानाने 38 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला होता. आतापर्यंतचे उन लक्षात घेता यावेळचा उन्हाळाही पिंपरी-चिंचवड वासियांना घाम फोडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.