पुणे – करोनामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. आता निकाल लावण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा राज्य मंडळ की विद्या प्राधिकरण यापैकी कोणी तयार करायचा यावरून वाद उफाळून येऊ लागले आहेत. या वादात आराखडा रखडला आहे.
दहावीच्या परीक्षासाठी 16 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र मंडळाकडून 29 एप्रिल ते 20 मेदरम्यान या परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र, करोनामुळे त्या पुढे ढकलल्या. सीबीएसई बोर्डाने व सीआयएससीई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर त्यापाठोपाठ राज्य मंडळानेही रद्द करण्याचा निर्णय घेतला. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात येणार आहे.
याबाबत राज्य मंडळ व इतर तज्ज्ञ एकत्र येऊन चर्चा करून निकालाबाबत निकष ठरविणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी, राज्य मंडळ, सल्लागार समिती यांची पहिली बैठक घेतली. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य यांची ऑनलाइन बैठक घेतली. बैठकाचे सत्र आजूनही सुरूच आहे. राज्य मंडळाचे काम हे परीक्षा घेण्याचे आहे. निकालाबाबत अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा तयार करण्याचे व ते जाहीर करण्याचे काम व अधिकार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (विद्या प्राधिकरण) आहे. मात्र, अद्यापपर्यंत निकष काय ठरवायचे यावर अधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नाही. दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे काम आमचे नाही, असे म्हणत अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी सुरू आहे.
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या निकालाबाबत अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा तयार करून तो जाहीर केला आहे. त्यामुळे शाळांनी निकालाचे कामकाज सुरू केले आहे. महाराष्ट्र मंडळाचे मात्र अद्याप दहावीची परीक्षा रद्द केल्याचेही लेखी आदेश काढलेले नाहीत. निकालाबाबत अंतर्गत मूल्यमापन आराखडा तयार होत नसल्याने विद्यार्थी, पालकांचे मात्र टेन्शन वाढत आहे.