पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. यातील इयत्ता बारावीचा निकाल 15 ते 20 जुलैपर्यंत, तर दहावीचा 31 जुलैअखेर लागण्याची शक्यता आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. यंदा दीड ते दोन महिने निकालाला उशीर होत आहे.
राज्यातील नऊ विभागांत इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत झाली. दहावीची 3 ते 23 मार्चदरम्यान घेण्यात आली. राज्यात मार्चपासून लॉकडाऊन आहे. दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षाही रद्द केली. या पेपरला इतर पेपरच्या सरासरीप्रमाणे गुण देण्याचे सूत्रही ठरविण्यात आले आहे.
बारावी परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27, तर दहावीच्या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून त्या त्या विभागात तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा झाल्या आहेत. राज्यात उत्तरपत्रिका संकलनासाठी विशेष केंद्रे सुरू केली होती. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मनातील करोनाची भीती कमी करण्यासाठीही विभागीय शिक्षण मंडळांना विशेष प्रयत्न करावे लागले आहेत.