महर्षीनगर – सातारा रस्ता ते सुयोग सेंटर रस्त्यावर विद्युत वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यास दिलेल्या परवानगीची मुदत संपल्यानंतर महावितरणने काम सुरू केले असून ते अर्धवट ठेवल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे आहे तर लॉकडाऊनच्या काळात मजूर कामगार उपलब्ध होत नसल्याने हे कामच उशीरा सुरू केल्याने याची मुदत वाढवून मिळणे गरजेचे आहे, असे महावितरणचे म्हणणे आहे. पालिका आणि महावितरणच्या ताणाताणीतून महर्षीनगर येथील काम रेंगाळले आहे.
याबाबत भाजपचे पदाधिकारी अविनाश शिळीमकर यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, महावितरण विभागाला खोदकाम करण्यास दिलेली मुदत दि. 31 मार्चला संपली आहे. हे कामच तीन महिन्यानंतर लॉकडाऊन काळात सुरू करण्यात आले. मात्र, कामही पूर्ण झाले नाही तर पदपथावरील खड्डेही तसेच ठेवण्यात आले आहेत. या चुकीच्या खोदकामाची तक्रार पोलिसांकडे देणार आहे, असे पालिका पथ विभागाचे अधिकारी आदिल तडवी यांनी सांगितले.
संबंधित खोदकामाची परवानगी दि. 31 मार्चला संपलेली असताना मुदतीनंतर महावितरणने सदर खोदकाम केले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्याबाबत वरिष्ठांकडे कागदपत्रे दिलेली आहेत. तक्रार करणे व रस्ता दुरुस्ती कोण करणार? या बाबत मिटिंगनंतर निर्णय होईल. सध्या, करोनामुळे मिंटिंग झालेली नाही.
– आदिल तडवी, उपअभियंता पथ विभाग, पुणे महानगरपालिका
महर्षीनगर येथे विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामाला महानगरपालिकाकडे 30 लाख रुपये भरून रितसर परवानगी घेण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात कामगार निघून गेल्याने कामास उशीर झाला. पालिकेकडून काम करण्याची मुदत वाढवून मिळाली असून अपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल.
– एस. एस. दराडे, कार्यकारी अभियंता पर्वती विद्युत विभाग