नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्या पूर्व लडाखमधील सीमेवर असणारा तणाव निवळण्याची शक्यता आहे. एप्रिलपूर्वी ज्या ठिकाणी सैन्य होते, तेथे पुन्हा सैन्य नेण्यास दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे पूर्व लडाखमधील तणाव लवकरच निवळण्याची शक्यता आहे.
चुशूल येथे दोन्ही लष्कराच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठवी बैठक सहा नोव्हेंबरला झाली. या बैठकीत सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील आठवड्यात तीन टप्प्यात लष्कर माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. रणगाडे आणि अन्य लष्करी वाहनांच्या लक्षणीय अंतरावर मागे घेण्याची प्रक्रिया दोन्ही बाजूचे लष्कर राबवतील, असे ठरवण्यात आले.
रणगाडे आणि सशस्त्र जवान एका दिवसांत मागे घेण्यात येणार आहेत. या चर्चेत परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव आणि लष्करी कारवायांचे महासंचालक ब्रिगेडियर घई यांनीही सहभाग घेतला होता. दुसऱ्या टप्प्यात पेन्गोंग तलावाच्या उत्तरेकडील बाजूने दररोज 30 टक्के या प्रमाणे तीन दिवस सैन्य माघारी नेण्याचा निर्णय झाला. भारतीय सैन्य धनसिंग थापा चौकीजवळ परत जाईल तर चीनी सैन्य फिंगर आठ जवळील त्यांच्या केंद्रावर परत जाईल.
तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पेन्गोंग तलावाच्या दक्षिणेकडील भागातील सैन्याची माघार सुरू होईल. त्यात ताब्यात घेतलेली शिखरे आणि प्रदेश रिकामा करायचा आहे. हा भाग चुशूल आणि रेझांग ला या भागातील आहे. सैन्य माघारी ही प्रक्रियेची खातरजमा करून घेण्यासही मान्यता देण्यात आली. त्यासाठी ड्रोनच्या वापराला मान्यता देण्यात आली.
यावर्षी जूनमध्ये गलवान येथे झालेल्या संघर्षानंतर भारत चीनशी जपून वागत आहे. कोणतीही वाटाघाटी करण्यापुर्वी भारताने ठाम भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल, संरक्षण दल प्रमूख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आणि हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांच्या सुरक्षा पथकावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी शिखरांवर आधीच ताबा मिळवून चीनी सैन्याला दबावाखाली आणले आहे.