नवी दिल्ली : राजस्थानमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिलवाडा येथे २२ वर्षीय तरुणाची दुसऱ्या समाजातील काही लोकांनी बेदम मारहाण करत हत्या केली. हल्ल्यानंतर विश्व हिंदू परिषद, भाजपा आणि हिंदू जागरण मंचने भिलवाडा बंदची हाक दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पैशांवरुन झालेल्या भांडणानंतर काही मुलांनी २२ वर्षीय आदर्शवर हल्ला केला आणि त्याला जखमी केले. जिल्हा रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान ११ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून इंटरनेट २४ तासांसाठी बंद करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे गणेश प्रजापत यांनी याविषयी माहिती दिली. याविषयी बोलताना,“भिलवाडामध्ये वारंवार जातीय घटना समोर येत आहेत”. दरम्यान त्यांनी तरुणाच्या कुटुंबाला ५० लाख रुपये देण्याची आणि सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे.
“ही अत्यंत लाजिरवाणी घटना असून पोलीस आणि सरकारला झोपेतून जागी करणारी आहे,” असे भाजपा आमदार विठ्ठल अवस्थी म्हणाले आहेत.