नवी दिल्ली : देशात दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण होत असतानाच आता पुन्हा एकदा सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. कारण मागील खाई दिवसनपासून देशात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातही आता ‘आर व्हॅल्यू’ ही १.० वर पोहोचली असल्याने याला बळ मिळत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आता ‘आर व्हॅल्यू’ ही १.० वर पोहोचली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचे हे संकेत मानले जात आहेत.’ आर व्हॅल्यू’ १.० वर पोहोचणे ही चिंतेची बाब असल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
‘आर व्हॅल्यू’ वाढणे म्हणजे एका करोनाबाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग होण्याची तीव्रता वाढीस लागणे. म्हणजेच ०.७ ते ०.९ या श्रेणीत ‘आर व्हॅल्यू’ असेल तर १० करोनाबाधित व्यक्ती ७ ते ९ लोकांपर्यंत संसर्ग पोहोचवू शकतात. ‘आर व्हॅल्यू’ कमी झाली तर संसर्ग पसरण्याची शक्यताही घटते.
डेटा सायन्सनुसार रिप्रॉडक्शन रेट – करोना विषाणूचा पुनरुत्पादन दर – म्हणजे ‘आर व्हॅल्यू’. एक बाधित व्यक्ती किती जणांना बाधित करू शकते, हे ‘आर व्हॅल्यू’ सांगते. केरळ राज्यात करोनाचे नवे बाधित आढळून येऊ लागले आहेत. केरळची ‘आर व्हॅल्यू’ १.११ एवढी आहे. याचाच अर्थ करोना विषाणूचा संसर्ग केरळमध्ये झपाट्याने होत आहे.
ईशान्येकडील त्रिपुरा राज्याची ‘आर व्हॅल्यू’ १ पेक्षा कमी आहे. ‘आर व्हॅल्यू’ कमी करायची असेल तर लसीकरण झपाट्याने होणे गरजेचे आहे.
कांजिण्यांसारखा संसर्गजन्य
* कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट कांजिण्यांसारखा संसर्गजन्य असू शकतो.
* कांजिण्यांचा संसर्ग दर एका व्यक्तीपासून ८ जणांना असा होता.
* डेल्टा व्हेरिएंट भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळेच दुसरी लाट भारतात तीव्र होती.