मुंबई : न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी आरे मध्ये वृक्षतोड करण्यास सुरवात झाली. त्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमी जंगल वाचवण्यासाठी पुढे आले आणि आंदोलन उभे राहिले. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु केलं. मात्र या प्रकरणात 29 आंदोलकांना अटक कऱण्यात आली. तसंच आरे भागात जमावबंदीचं कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का? असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
चौधरी यांनी केलेल्या पोस्ट मध्ये ते म्हणालेत की, “ज्येष्ठांच्या पिढीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलणं सोडून दिलंय का?आरेच्या प्रश्नावर मेधाताई सोडून कोणी बोलणार आहे की नाही? दरवेळी अण्णांकडूनच अपेक्षा नाही. ज्यांना महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं असे मोठे सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात आहेत. साहित्यिक, कलावंत, खेळाडू कधी बोलणार? त्यांना जगण्यासाठी ऑक्सीजन लागत नाही? लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का?”
दरम्यान उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे ५00 कापली आहेत. त्यानंतर आरे वाचवा म्हणत अनेक आंदोलकांनी आंदोलन सुरु केलं. आंदोलकांना अटक कऱण्यात आली.
वृक्षतोडीचे फोटो काढले जाऊ नयेत, म्हणून आंदोलकांचे मोबाइलही ताब्यात घेतले. वृक्षतोडीविरोधात आंदोलकांनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शनिवारी फेटाळला आहे. तसंच आरे भागात जमावबंदीचं कलम लागू कारत लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.