सर्वाधिक रोजगार पुण्यात : नागपूरमध्ये केवळ 23 तरुणांना मिळाले काम
पिंपरी – टाळेबंदीमुळे मोठ्या संख्येने आपापल्या राज्यात परतलेल्या कामगारांमुळे स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग, व्यवसायात काम मिळण्याची निर्माण झालेली संधी उद्योजकांकडून स्थलांतरितांना परत आणण्याच्या प्रयत्नाने हिरावून घेतली आहे. एप्रिल ते जून दरम्यान पुणे विभागातील 37 हजार 562 तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ 10 हजार 317 तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जूनअखेरपर्यंतची ही आकडेवारी देण्यात आली आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी परतले. अंशत: टाळेबंदी शिथिल झाल्यावर उद्योजकांना कामगार मिळेनासे झाले. त्यामुळे राज्य शासनाने कौशल्य विकास विभागाकडे नोंदणी केलेल्या स्थानिक कुशल व अकुशल कामगारांना संधी देण्याचे ठरवले. तसेच तरुणांना पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. एप्रिल ते जूनअखेपर्यंत 1 लाख 72 हजार 165 नोकरी इच्छुकांनी नोंदणी केली. यात जुन्या नोंदणीधारकांचाही समावेश होता. यात पुणे विभागातील 37 हजार 562 तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली होती. मात्र जुनअखेरपर्यंत केवळ 10 हजार 317 तरुणांना रोजगार मिळाला आहे.
लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्यानंतर स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कौशल्य विकास विभागाकडे नोंदणी करणाऱ्या कुशल व अकुशल कामगारांना संधी देण्याची विनंती केली होती. शासनाचा निर्णय म्हणून उद्योजकांनी याला प्रतिसादही दिला. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण, कुरकुंभ, आणि रांजणगाव या औद्योगिक वसाहती आहेत. लॉकडाउनच्या काळात झालेल्या स्थलांतरामुळे या वसाहतींमधील अनेक कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद पडल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली.