अकोला: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालात मुस्लिम मतांची साथ न मिळाल्यानेच पराभव झाल्याचे वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांनी यावेळी अनेक गौप्यस्फोट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष आपल्या संपर्कात असल्याचे आंबेडकर म्हणाले. अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘औरंगाबाद सोडून कोठेही वंचित आघाडीला मुस्लिम मत मिळाली नाहीत. त्यामुळे औरंगाबादमध्येच आम्हाला विजय प्राप्त करता आला. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून या वक्तव्यावर असदुद्दीन ओवैसी काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेल्या राजू शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे पुढच्या काळात राजू शेट्टींनी कुणासोबत जावं ते लवकर ठरवावे. तसेच युतीमुळे विधानसभेत शिवसेनेची पोकळी राज ठाकरेंना किंगमेकर बनवू शकते, असेही आंबेडकर म्हणाले.