मुंबई : राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारी चार वाजता राज्यात दहा कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात लसीची पहिली मात्रा 6,80,53,077 तर दुसरी मात्रा 3,20,74,504 देण्यात आल्या आहेत. एकूण 10,01,27,581 लस मात्रा देण्यात आल्या आहेत. या यशात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांच्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्य दिले आहे.
यासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच हा टप्पा पार करता आला. राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून लसीकरण केले जाणार आहे.
त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला 31 डिसेंबर पर्यंत लसीच्या दोन्ही मात्रा देण्याचे उद्दिष्ट आहे.लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य अशी अभियान राबविण्यात आले आहे, असेही टोपे यांनी सांगितले.