वडूज -पोलिसांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करीत असताना त्यांना उत्तम पायाभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून सातारा पोलीस दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 10 कोटींचा वाढीव निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
वडूज येथील पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. महेश शिंदे, आ. जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे, आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे आदी उपस्थित होते. पोलिसांनी गुन्हेगारांची पाळेमुळे उकडून टाकण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी काहीही करावे लागले तरी करण्याची पोलिसांची तयारी असली पाहिजे.
गुन्हेगारांशी संबंध असलेल्या लोकांकडून कामात हस्तक्षेप होत असेल अथवा त्यांना मदत करण्यासाठी कोणी राजकीय दबाव टाकत असल्यास अधिकाऱ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. गुन्ह्यांचा वेगाने तपास, त्यातील अचूकता, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधांचा क्षमतेने वापर, पोलीस पाटलांशी संवाद वाढविणे या माध्यमातून आपली चांगली प्रतिमा निर्माण करून पोलीस स्टेशनचे मानांकन निश्चित करावे.
मात्र, हे सगळे करत असताना पोलिसांना चांगल्या सुविधा देणे हे राज्यकर्ते म्हणून आमचे काम असल्याची जाणीव मला आहे. त्यामुळे पोलीसांवर येणारा ताण लक्षात घेता पोलीस भरतीला परवानगी देण्यात आली आहे. पोलीसांचे प्रश्न सोडविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पोलीसांनी ‘स्मार्ट पोलीसिंग’ च्या माध्यमातून जनतेच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीविषयी माहिती दिली.
बांधकाम विभागावर ताशेरे
वडूज पोलीस ठाण्याची इमारत कोट्यवधी रूपये खर्च करून बांधली आहे. मात्र, जेवढ्या प्रमाणात पैसे खर्च केले तेवढ्या प्रमाणात इमारतीचे काम दर्जेदार झाले नसल्याने संतापलेल्या अजितदादांनी बांधकाम विभागावर कडक शब्दात ताशेरे ओढले. नव्या इमारतीच्या पोर्चपासून ते छतापर्यंत एका नजरेत दादांनी काही उणीवा काढल्याने व त्यानंतर जाहीर कार्यक्रमात ओरखडे ओढल्याने बांधकाम विभाग आता तरी कारभार सुधारेल का अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.