नवी दिल्ली : देशातील आपत्कालीन प्रसंगात काम करणे सोपे व्हावे यासाठी देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोल घेणे तात्पुरत्या स्वरुपात बंद केले आहे. यादरम्यान आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत लोकांचा वेळ यामुळे वाचू शकेल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
In view of Covid-19, it has been ordered to temporarily suspend the collection of toll at all toll plaza across India. This will not only reduce inconvenience to the supply of emergency services but also save critical time. #IndiaFightsCorona
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 25, 2020
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये, रस्त्यांची दुरुस्ती आणि टोल प्लाझांवर आपत्कालीन सुविधा या दरम्यान सुरुच राहतील. कोरोनामुळे सध्या देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान हायवे तसेच राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या काळात केवळ आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारी वाहनं, अत्यावश्यक सेवांशी संबंधित सरकारी वाहनं आणि अॅम्ब्युलेंस आणि अशा सेवांशी संबंधित वाहनांनाच सध्या प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. गडकरी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत वाहनांना सेवा पुरवण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल.