चौघांचा जागीच मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक
पालघर – करोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या दरम्यान होणारी ससेहोलपट टाळण्यासाठी अनेक मजूर आपल्या घराकडे निघाले आहेत. वाहनांना बंदी असल्याने हे मजूर पायीच प्रवास करत आहेत. विरारमध्ये या मजूरांची हीच घरी जाण्याची ओढ जीवावर बेतली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पायी निघालेल्या 7 जणांना एका टेम्पोने उडवले. या भीषण अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
रमेश भट (55), निखिल पांडे (32), नरेश कलसुवा (18) आणि काळुराम बागोरे (18) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, देशात लॉकडाऊन असल्याने सर्वच प्रवासी वाहने बंद आहेत. त्यामुळे घराकडे निघालेल्या नागरिकांनी नाईलाजाने पायीच प्रवास सुरु केला आहे.
हे सर्व प्रवासी देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात होते. गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले.
परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील पहाटे तीन वाजेच्य सुमारास विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयसार टेम्पोने यांना जोरदार धडक दिली. यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली असून विरार पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.