दहा लाख जीवजंतूंच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर
नवी दिल्ली – मानवी इतिहासात प्रथमच कार्बन डाय ऑक्साईडचे (सीओटू) प्रमाण वातावरणाच्या दशलक्ष भागाच्या तुलनेत 415 भागापेक्षाही जास्त (415.26) झाले आहे. त्यामुळे वातावरणातील तापमान वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचा नॅशनल ओशियानिक अँड ऍटमोसफेरिक एजन्सीच्या (एनओएए) मौना लोआ ऑब्झर्व्हेटरी या उपसंस्थेने केलेल्या अहवालात इशारा देण्यात आला आहे.
वातावरणातील कार्बनच्या वाढत्या प्रमाणाबद्दल “एनओएए’चे संशोधक एरिक होल्थॉस यांनी आपले संशोधन सादर केले आहे. निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि तथाकथित आर्थिक विकास, त्यातून वाढते कार्बन उत्सर्जन यामुळे पृथ्वीवरील जवळपास दहा लाख जीवजंतूंच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असेही त्यांनी या अहवालात मांडले आहे.
कार्बन वातावरणातील उष्णता शोषूण घेतो, त्यामुळे त्याचे प्रमाण वाढल्यास पृथ्वीचे तापमानही वाढत जाते, हाच मोठा धोका आहे. पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र उष्णता शोषून घेणे आणि उत्सर्जनाचे काम करतात. हीच उष्णता कार्बन शोषून घेतो. ग्रीन हाऊस गॅसेसमुळे पृथ्वीचे तापमान नियंत्रणात ठेवले जाते; परंतु त्याचे प्रमाण वाजवीपेक्षा वाढल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणात असंतुलन निर्माण होते. त्यातून पृथ्वीचे सरासरी तापमान वाढते, असे “एनओएए’ने संशोधनात म्हटले आहे.