पुणे – टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत आहे. शहराला खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. वरसगाव, पानशेत आणि टेमघर या तीन धरणांमधून टप्प्याटप्याने शहरासाठी पाणी खडकवासला धरणात सोडले जाते. यावेळी पाणी सोडताना पहिले प्राधान्य टेमघर धरणाला दिले आहे.
शहरासाठी आधी टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले. टेमघर धरण लवकर रिकामे केले तरी शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. सध्यस्थितीत टेमघर धरणात फक्त 25 टक्के म्हणजे सुमारे 1 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीस धरण दुरुस्तीचे काम सुरु होण्याची शक्यता आहे. शेवट्याच्या टप्प्यातील हे काम असल्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर धरणातील गळती थांबण्यास मदत होणार आहे, असे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. टेमघर धरण बांधण्याचे काम 2001 मध्ये पूर्ण झाले.
टेमघर धरणाची एकूण क्षमता पावणेचार टीएमसी इतकी आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 15 वर्षांत धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे धरण दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. धरणात पाणी असताना हे काम करणे शक्य नसल्यामुळे धरणातील पाणी पिण्यासाठी खडकवासला धरणात सोडण्यात येते. धरण रिकामे झाल्यानंतर मगच दुरुस्तीचे काम करण्यात येते. यंदा टेमघर धरण 100 टक्के भरण्यात आले होते.
गळती 100 टक्के बंद होणार
धरण दुरुस्तीचा पहिले दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात धरणाची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम सुरू आहे. टेमघर धरणाची उंची 86 मीटर तर लांबी 1075 मीटर आहे. एवढ्या भागामध्ये सिमेंट आच्छादीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळा व अन्य कारणांमुळे हे काम थांबले होते. उर्वरीत 30 टक्के दुरूस्तीच्या कामाला पुढील महिन्यापासून सुरूवात होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातील गळती 100 टक्के बंद होणार आहे, असा दावा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आला.