सविंदणे – शिरूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कुटुंबावर झाला आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, तरकारी पिकांची वाताहत झाली आहे. त्यामुळे सांगा, आता आम्ही जगायचं कस, हा एकच मूक आक्रोश शेतकरी करीत आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी पाण्याची टंचाई असताना तसेच चारा छावण्यासाठी प्रशासनाकडे हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांना आता निसर्गाचा तडाखा अनुभवयास मिळत आहे. एकाच वादळी पावसाने शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. त्याचा परिणाम पुढील तीन वर्षे शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.