अरुंधती रॉय यांचे विचित्र आवाहन
नवी दिल्ली – पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेमध्ये उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) साठी वापरली जाणार आहे. त्यामुळे “एनआरसी’ला रोखण्यासाठी जनगणनेदरम्यान नागरिकांनी आपली खरी नावे आणि पत्ते सांगू नयेत, असे विचित्र आवाहन लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केले आहे. दिल्ली विद्यापिठामध्ये “एनआरसी’विरोधी आंदोलनाचा भाग म्हणून आयोजित एकत्रीकरणाला संबोधित करताना रॉय यांनी हे आवाहन केले. “एनआरसी’ने देशातील मुस्लिमांना लक्ष्य केले आहे, असा आरोपही रॉय यांनी केला.
राष्ट्रीय जनगणना आणि “एनआरसी’चा काहीही संबंध असणार नाही. जनगणनेमध्ये मिळणारी माहिती “एनआरसी’साठी वापरण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. एखादी व्यक्ती एखाद्या भागात 6 महिने राहिली असेल अथवा पुढील 6 महिने त्या भागात राहणार असेल, तर त्या व्यक्तीची जनगणनेतील नोंद “नियमित रहिवासी’ अशी केली जाते. जनगणनेमध्ये नाव, पत्ता, फोन क्रमांक आणि अन्य तपशील मागितला जातो. कागदपत्रांसाठी आधार क्रमांक आणि वाहन परवाना मागितला जातो. हीच माहिती “एनआरसी’साठी वापरली जाईल. म्हणून चुकीची नावे आणि पत्ते सांगावेत, असे अरुंधती रॉय यांनी आंदोलकांना सांगितले.
“एनआरसी’ प्रक्रियेबद्दल सरकार कधीही बोलले नाही आणि देशात “डिटेंशन सेंटर’ नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलीला मैदानाच्या रॅलीत खोटे बोलल्याचा आरोप रॉय यांनी केला.