नवी दिल्ली – केंद्र सरकारने दूरसंचार क्षेत्रातील सुधारणासाठी व या क्षेत्रातील कंपन्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सर्वसमावेशक पॅकेज जाहीर केले. यामुळे डिजिटल इंडिया विकसित होण्यासाठी मदत होईल असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे व जिओ कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.
सध्याच्या अर्थव्यवस्थेत दूरसंचार क्षेत्राने महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. त्याचबरोबर डिजिटल इंडियासाठी दूरसंचार क्षेत्र बळकट होणे गरजेचे आहे. सरकारने या क्षेत्राच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
दूरसंचार केंद्राचे भवितव्य कसे असेल अशी शंका दूर क्षेत्रातील कंपन्याबरोबरच गुंतवणूकदारांना वाटत होती. मात्र आता केंद्र सरकारने या क्षेत्रासाठी दीर्घ पल्ल्याच्या सुधारणा जारी केल्यामुळे या क्षेत्रात निर्भयपणे गुंतवणूक होईल असे एअरटेल कंपनीचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी सांगितले.
बळकट अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने केलेल्या या मदतीमुळे दूरसंचार क्षेत्र आणि पर्यायाने डिजिटल पायाभूत सुविधा विकसित होतील. त्याचा सरकारबरोबर सर्वसामान्य लोकांना लाभ होईल असे मित्तल म्हणाले.