नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीत विरोधकांची महाआघाडी महाविजयी ठरेल. त्यामुळे महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचे टीकाकार 10 नोव्हेंबरला (निकालाचा दिवस) खामोश होतील, असे भाकीत ज्येष्ठ अभिनेते आणि कॉंग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले.
तेजस्वी यांनी अतिशय विचारपूर्वक तयारी करून बिहारमधील तरूणांना 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सत्तारूढ एनडीएच्या नेत्यांनी तेजस्वी यांच्यावर व्यक्तिगत टीका सुरू केली, असा शाब्दिक हल्लाबोल सिन्हा यांनी केला.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. बिहारमधील प्रचारावेळी मोदी विकासाच्या मुद्द्यांवर बोलले नाहीत. ते नेहमीच कॉंग्रेसमुक्त भारताविषयी बोलतात. पण, देश आता कॉंग्रेसयुक्त भारत बनत आहे.
बिहारमध्ये मोदी चीन, तिहेरी तलाक, कलम 370 विषयी बोलतात. ते विकास, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेतकरी हित या मुद्द्यांवर कधी बोलणार, असा बोचरा सवाल त्यांनी विचारला.