पाटणा,- बिहार मध्ये गेल्या तीस वर्षात कोणताही विकास झाला नाही हा निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केलेला दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी फेटाळून लावला आहे. प्रशांत किशार हे कोण व्यक्ती आहेत, त्यांचे बिहार मधील योगदान काय याची आपल्याला कल्पना नाही. त्यांनी हे निराधार विधान कशाच्या आधारावर केले आहे याचीही आपल्याला कल्पना नाही असे त्यांनी नमूद केले.
लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आणि नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात बिहार मागासच राहिला आहे असे विधान प्रशांत किशोर यांनी केले होते. प्रशांत किशोर यांनी स्वताचा वेगळा पक्ष काढून राजकीय क्षेत्रात कार्याला सुरूवात करायचे ठरवले असून त्याची सुरूवात त्यांनी बिहार मधून करण्याचे योजले आहे. त्यासाठी ते तेथे कार्यरत झाले असून त्यांनी राजद आणि संयुक्त जनता दलाच्या कार्यपद्धतीवर टीका सुरू केली आहे. त्याला राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आज जोरदार आक्षेप नोंदवला.
यावेळी बोलताना त्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या संबंधात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही टीका केली. संसदेत नितीशकुमार यांच्या पक्षाने विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते त्यावरूनही त्यांनी नितीश यांच्यावर हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, सीएए-एनआरसीवर आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही संसदेत याला नेहमीच विरोध करत आलो आहे आणि बिहारमध्ये ते केव्हाही लागू होईल, असे मला वाटत नाही. जेडीयूने संसदेत या विधेयकाला पाठिंबा दिला होता त्यांच्या या भूमिको विरोध म्हणून लोक रस्त्यावर उतरले होते असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.