नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडी समोर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे. दरम्यान, बिहारमध्ये लवकरच तेजस्वी पर्व सुरु होईल असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
बिहारमध्ये मतमोजणी सुरू आहे. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीनं आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या कल हाती येताच राजदच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले,”निकाल पूर्ण यायचे आहेत. जे कल पाहिले आहेत. त्यावरून एका तरुण नेत्यानं. त्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन जी ताकत उभी केली आहे. आता अटीतटीची लढत आहे. मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल, तेव्हा लोकं जंगल राज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू झालेलं असेल,” असं संजय राऊत म्हणाले.