पाटना – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. त्यामुळे लालू यादव यांचा आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) पक्ष पुन्हा एकदा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजप दुसऱ्या स्थानावर गेला आहे.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या पाचपैकी चार आमदारांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला आहे. एआयएमआयएमच्या आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केल्यानंतर देशभरात हा विषय चर्चेत आला आहे. बिहारमधील एआयएमआयएमचे आमदार हाजी इजहार आसफी-कोचधामन (किशनगंज), अंजार नईमी-बहादूरगंज (किशनगंज), बैसी विधानसभेचे आमदार मोहम्मद रुकनुद्दीन, शाहनवाज आलम – जोकीहाट (अररिया) यांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत 2020 मध्ये ओवेसींच्या पक्षाने बिहारमध्ये 5 जागा जिंकल्या. चार आमदारांव्यतिरिक्त, पाचवे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान हे एआयएमआयएममध्येच आहेत. या घटनेकडे तेजस्वी यादव विरुद्ध ओवेसी असं पाहिलं जात आहे.
बिहारमध्ये ओवेसींनी महाआघाडीशी फारकत घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन केली होती. यामध्ये उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही घोषित केले होते. तसेच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा पक्ष बसपा, ओवेसींचा एमआयएम, समाजवादी दल डेमोक्रॅटिक, डेमोक्रॅटिक पार्टी सोशालिस्ट आणि राष्ट्रीय लोक समता पक्ष यांचा नव्या आघाडीत समावेश होता. ओवेसी यांनी बिहारमध्ये २० जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांनी सीमांचल भागातील पाच जागा जिंकल्या होत्या.