सातारा/नागठाणे -पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय 17, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याप्रकरणी अमित राजेंद्र गायकवाड (रा. जिल्हा परिषद कॉलनी, शाहूपुरी, सातारा) याला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने आशिष बन्सी साळुंखे, साहिल रुस्तुम शिकलगार (दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा), शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव (रा. मोळाचा ओढा, सातारा) या तिघांना यापूर्वीच ताब्यात घेतले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अमित गायकवाड याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तेजस जाधव याला व्यायामाची आवड होती. तो नेहमीप्रमाणे नागठाणे येथे 11 डिसेंबर 2019 रोजी व्यायामासाठी दुचाकीवरून गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्याच्या घरातल्यांनी त्याचा शोध
घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.
दरम्यान, आष्टे गावापासून जवळच तेजसची दुचाकी तो बेपत्ता झाला त्याच दिवशी सापडली होती. त्याठिकाणी दुसऱ्या एका गाडीची चावीसुद्धा आढळून आली होती. हा सारा प्रकार वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलिसांना सांगितला होता.
दोन महिन्यांपासून तेजसचा सर्वजण शोध घेत होते. याचवेळी एकाचा तेजसच्या वडिलांना फोन आला. “तुमच्या मुलाचे 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे,’ असे त्यांना सांगण्यात आले. या फोनची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने साळुंखे, शिकलगार, जाधव यांना अटक केली होती.
त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे देण्यात आला होता. शेख यांनी दोन दिवस तपास करून अमित गायकवाड याचे या गुन्ह्यात नाव निष्पन्न करून त्याला अटक केली. गायकवाड याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.