पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील निघोज येथे कार्यरत असलेले तलाठी विनायक निंबाळकर यांनी गैरवर्तन केल्याबाबत पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात तहसीलदार देवरे यांनी म्हटले आहे की, मॅडम, तुम्ही टिटवीचे मटण खाता काय, असा सवाल संबंधित तलाठ्याने आपणास जमावासमोर विचारला. तसेच तुमची बदली करायची, असे आमच्या संघटनेने ठरवले असून, आम्ही चार ते पाच दिवसांत तुमची बदली करीत आहोत. आम्हाला तुमच्यामुळे रात्रंदिवस काम करावे लागत आहे. म्हणून आम्हाला तुमच्या हाताखाली काम करायचे नाही, असा संघटनेने पवित्रा घेतला आहे, अशी धमकी निंबाळकर यांनी दिली आहे.
सद्यस्थितीमध्ये करोना आपत्तीमुळे सर्व तलाठ्यांनी मुख्यालयी राहून कामकाज करावे, यासाठी मी वारंवार प्रयत्नशील असल्याने संघटनेचे कार्याध्यक्ष असणारे निंबाळकर त्यांनी चारचौघांसमोर बोलून तालुका दंडाधिकारी या पदाचा अपमान केला आहे व महिला तहसीलदार असल्याने त्यांनी माझी मानहानी केली आहे. वास्तविक निंबाळकर मुख्यालयी राहात नाहीत. निवारागृहाच्या नावाने आलेल्या देणग्या परस्पर रोख स्वरूपात स्वीकारतात. त्यांचा हिशोब सादर केला नाही. वारंवार सांगूनही ते दिवसाआड निघोज गावी येतात.
निघोज येथे राहण्याची त्यांना सक्ती केल्यामुळे त्यांनी माझ्यावर बेछूट वक्तव्य केले आहेत. त्यांनी माझ्या पदाचा कोणताही मुलाहिजा ठेवला नाही. तसेच आपत्ती काळामध्ये ते जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथून दैनंदिन ये-जा करत आहेत. त्यामुळे निघोज सारख्या संवेदनशील गावात अन्य तलाठ्याचीनेमणूक करावी व सदर तलाठ्यास गैरवर्तनाबाबत निलंबित करण्यात यावे, तसेच तहसीलदारांनी कमी काम करावे, असे बोलून ते आपत्ती व्यवस्थापन कामात अडथळा निर्माण करीत आहेत, अशा प्रकारचे पत्र देवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.