पुणे – राज्य शिक्षण मंडळाने नुकतेच दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणच्या पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणला प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी स्वतंत्री प्रवेश फेरी राबविण्यात यावी, अशी मागणी संस्था चालकातून होत आहे.
दरवर्षी दहावी पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जाते. त्यासाठी विशेष फेरी, समुपदेशन फेरी घेण्यात येते. त्यानुसार पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयटीआय आणि अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात आले आहे.
मात्र, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) आणि तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावी आणि बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेत पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अजून संधी देण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर पुरवणी परीक्षेतील दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांस प्रवेश मिळण्यासाठी विशेष फेरी किंवा समुपदेश फेरी घ्यावी, अशी मागणी “असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ नॉन एडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया’ या संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.