जेवणातून कांदा गायब; कांद्याऐवजी कोबी भजी
नगर – परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून, भाज्यासह कांदा-बटाट्यांच्या आवकवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. कांद्याचे दर 35 वरून थेट 70 रुपयांपर्यंत गेल्यामुळे परिसरात हॉटेलचालक आणि हातगाड्यांवरील कांदा भजी विक्री करणाऱ्यांनी कांदा भजीची विक्रीच बंद केली आहे.
अनेक ठिकाणी ग्राहकांना कांद्याऐवजी कोबीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.कांद्याच्या वाढीव दरामुळे कांदाभजी विकणे हॉटेलचालकांना परवडत नसून, जोपर्यंत कांद्याचे दर उतरत नाहीत, तोपर्यंत कांदाभजीची विक्री न करण्याचे काही हॉटेलचालकांनी ठरविले आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे परिसरात भाज्यांचे दरही कडाडले आहेत. भाजी पाल्यासह, कोथिंबीर, कांद्याचे दरही वाढले आहेत.
मात्र गेल्या आठवडाभरातील कांद्याचे दर 60 ते 65 रुपयां पर्यंत विकला जात आहे.त्यामुळे हातगाड्यांवरील आणि लहान-मोठ्या हॉटेलमध्ये कांदा भजीची विक्री थांबवली आहे. सध्या कांद्याचे दर पाहता, पूर्वीच्याच दरात कांदा भजी विकणे परवडत नसल्याचे काही हॉटेलचालक सांगत आहेत. तर, अचानक कांदाभजीचे दर वाढवल्यास, ग्राहकांवर त्याचा परिणाम होतो.
त्यामुळे कांद्याचे दर कमी होईपर्यंत कांदाभजीची विक्री थांबवण्याचा निर्णय कांदाभजी विक्रेत्यांनी घेतला असून, अनेक ठिकाणी तर कांदा भजीला कोबीचा वापर करत कोबीच्या भजीची विक्री केली जात आहे. परिसरात हॉटेलमध्ये जेवणासोबत मोफत दिले जाणारे लिंबू,कांदा यातून कांदा वगळण्यात आल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे भाजीपाल्यांच्या आणि कांद्यांच्या वाढीव दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आहारात कांदा सध्या गायब होत असल्याचे दिसत आहे.