माजी मुख्यमंत्री फडणवीस; तिन्ही पक्षांत समन्वय नसल्याची टीका
पुणे – राज्यातील सरकार पाडणे हा आमचा अजेंडा नाही. हे सरकार कसे चालले आहे हे जनता पाहात आहे. सरकारातील तीन पक्षांच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्री आणि प्रशासनात समन्वय नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सरकार स्थापन झाले असते असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी नुकताच एका मुलाखतीत केला होता. याचा संदर्भ घेत, आता परत राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जाऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न आहे का? असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, हे सरकार पाडणे हा आजच्या परिस्थितीत आमचा “अजेंडा’ नाही. करोनाच्या विरोधातील लढ्यातील अडचणी आम्ही सरकारपुढे मांडू, त्यांना चुका दाखवून देऊ. त्याचे राजकीय मूल्यमापन करण्याची आता ही वेळ नाही.
प्रशासकीय अधिकार, मंत्री, मंत्रिमंडळ यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. हा समन्वय साधण्याची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांची आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.
कोणी राजीनामा द्यावा, कोणी सत्ता सोडावी, अशी आता आमची मागणी नाही, त्यादृष्टीने आमचे प्रयत्नही नाहीत; परंतु हे सरकार ज्या पद्धतीने चालले आहे, त्यामुळे फार दिवस सरकार पाडणे आमचा अजेंडा नाही. वाट पाहावी लागणार नाही असेही दिसते, अशी सूचक टिप्पणी फडणवीस यांनी केली.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर राज्यात सत्ता स्थापन झाली असती याचा फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. तेव्हाच सत्ता स्थापन झाली असती परंतु, पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आपल्याला शिवसेनेबरोबर राहावेच लागेल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन होऊ शकली नाही, असेही फडणवीस म्हणाले. याविषयावर अधिक काही बोलण्याला फडणवीस यांनी नकार दिला. या अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिणार आहे, त्यात यावर सविस्तर लिहीन, असे सांगत त्यांनी या विषयाला बगल दिली.