लीड्स – लॉर्डस कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर हेडिंग्ले कसोटीत विजय मिळवत मालिका सुरक्षित करण्यासाठी बुधवारी भारतीय संघ तिसऱ्या कसोटीत उतरला. मात्र, भारतीय संघाची बेजबाबदार फलंदाजी इंग्लंडच्या पथ्यावर पडली. भारताचा संपूर्ण डाव अवघ्या 78 धावांवर गुंडाळत इंग्लंडने धडाक्यात सुरुवात केली.
ज्या हेडिंग्ले मैदानावर भारतीय संघाने आजवर एकही कसोटी सामना गमावलेला नाही त्याच मैदनावर संघ लाजिरवाणा पराभव स्वीकारणार हे पहिल्याच दिवशी दिसू लागले आहे. या सामन्यात भारताच्या केवळ रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांनाच दोनअंकी धावसंख्या उभारता आली. अन्य फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही नोंदवता आली नाही. इंग्लंडच्याच गोलंदाजांनी 16 अवांतर धावांचा वाटा घेत भारताच्या धावसंख्येला हारभार लावला असे म्हणावे लागेल.
भारताचा पहिला डाव 78 धावांवर आटोपला. तिसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र, त्याचा हा निर्णय भारतीय संघाच्याच अंगलट आला. रोहित शर्मा (19) आणि अजिंक्य रहाणे (18) वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन, क्रेग ओव्हरटन आणि सॅम कुरेनने भारताच्या संपूर्ण फलंदाजीला क्लब दर्जाची ठरवले. अँडरसन आणि ओव्हरटन यांना प्रत्येकी 3, तर रॉबिन्सन आणि कुरेनने प्रत्येकी 2 बळी घेतले.
लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. लॉर्ड़स कसोटीत सामनावीर ठरलेल्या राहुलने या डावात साफ निराशा केली. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर याही कसोटीत चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा पहिल्या डावात अपयशी ठरला. तो एक धाव काढून तंबूत परतला. या दोघांनाही अँडरसनने यष्टीरक्षक जोस बटलकरवी झेलबाद केले. त्यानंतर अँडरसनने भारताला अजून एक धक्का देताना भारताचा कर्णधार विराट कोहलीला अवघ्या 7 धावांवर तंबूत पाठवले. याही डावात कोहली ऑफ स्टम्पच्या बाहेर जात असलेल्या चेंडूला बॅट लावून बाद झाला. त्यानंतर रोहित आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, रहाणेही कोहलीच्याच मार्गावर वाटचाल करत तंबूत परतला तर रोहित पूल मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर उर्वरीत सगळे फलंदाज आयाराम गयाराम ठरले. भारतीय संघाचे अर्धशतक फलकावर लावल्यानंतर उपाहारापर्यंत 25.5 षटकात 4 बाद 56 धावा अशी बिकट अवस्था झाली.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही निराशा केली. तो 2 धावांवर परतला. रॉबिन्सनने पंतला बाहेरच्या चेंडूवर झेल देण्यास भाग पाडले. या सामन्यात संधी मिळालेल्या क्रेग ओव्हरटनने रोहित आणि महंमद शमीला बाद करत इंग्लंडला आणखी यश मिळवून दिले. इंलंडच्या या डावात रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराज यांनाही झटपट बाद करत भारताचा डाव संपवला.
भारताने कसोटी मालिकेत लॉर्डस कसोटी जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्याने इंग्लंडवर हा सामना जिंकण्याचे दडपण आहे. दुसरीकडे भारताने हा सामना जिंकल्यास 35 वर्षापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. यापूर्वी 1986 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला 2-0 असे पराभूत केले होते. कोहलीने लॉर्डस कसोटीतीलच संघ या कसोटीतही कायम राखला.
हेडिंग्ले येथे झालेल्या 18 पैकी 17 कसोटी सामन्यांचा निकाल लागला आहे. 2021 साली केवळ एकच कसोटी अनिर्णित राहिली आहे. हेडिंग्लेतील वातावरण वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या कसोटीत भारताचा पहिला डाव पत्त्यंच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या परिस्थितीत भारताने रवीचंद्रन अश्विनला विश्रांती दिली आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, महंमद शमी, महंमद सिराज हे गोलंदाज संघात कायम राहिले तर, इंग्लंडने डेव्हिड मलान आणि आणि क्रेग ओव्हरटनला संधी देत गोलंदाजी व फलंदाजी मजबूत केली आहे.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 40.4 षटकांत सर्वबाद 78 धावा. (रोहित शर्मा 19, अजिंक्य रहाणे 18, जेम्स अँडरसन 3-6. क्रेग ओव्हरटन 3-14, ओली रॉबिन्सन 2-16, सॅम कुरेन 2-27).