गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये करोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर बंधने आली असल्याने क्रिकेट रसिक चुरशीच्या सामन्यांना मुकले होते. मध्यंतरीच्या काळात झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा आनंद घेता आला असला, तरी तो दोन देशांमधील संघर्ष नव्हता. मात्र, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील क्रिकेट सामन्यामुळे केवळ भारतीयच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट रसिकांना सर्वोच्च दर्जाच्या क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हे “मिशन ऑस्ट्रेलिया’ निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक क्रिकेटला बूस्टर डोस देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका अतिशय उपयुक्त ठरणार आहे. गेल्या काही कालावधीमध्ये अतिशय सुरक्षित वातावरणात आणि प्रेक्षकांविना कसोटी मालिका आणि झटपट क्रिकेटची मालिका खेळवण्यात आली असली, तरी भारत आणि ऑस्ट्रेलिया या टॉपच्या दोन संघांमधील संघर्ष उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. ही मालिका विविध कारणांनी महत्त्वाची आणि रंगतदार ठरणार आहे. एक तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट सामने खेळल्यानंतर केवळ एकच कसोटी सामना खेळून पितृत्व रजेसाठी भारतात परतणार आहे.
दुसरीकडे भारतीय क्रिकेटचा गेले कित्येक वर्षे आधारस्तंभ असलेला आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा तंदुरुस्तीच्या कारणामुळे अजून भारतातच असल्याने तो भारतीय संघात अद्यापही सामील झालेला नाही. शिवाय कसोटी मालिकाही तो खेळू शकेल की नाही याविषयी आतापासूनच शंका व्यक्त केली जात आहे. भारताचा आणखीन एक आघाडीचा गोलंदाज ईशांत शर्माबाबतही अशी शंका असल्याने तोही कसोटी क्रिकेट खेळू शकेल की नाही याबाबत अद्याप काहीच निश्चित सांगता येत नाही. म्हणजेच केवळ कसोटी मालिकेचा विचार करायचा झाल्यास विराट कोहली, रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंविना भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. अर्थात, गेल्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारा यष्टिरक्षक फलंदाज के.एल. राहुलला या निमित्ताने आपली उपयुक्तता सिद्ध करायची चांगली संधी मिळणार आहे.
एकदिवसीय क्रिकेट वा टी-20 क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेट, प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटसाठी भारतीय संघामध्ये काही बदल केले जातात. या तीनही प्रकारांमध्ये रोहित शर्मा अत्यंत उपयुक्त खेळाडू असल्याने त्याची अनुपस्थिती निश्चितच भारतीय संघाला जाणवणार आहे. पण अशाच परिस्थितीत भारतीय क्रिकेट निवड समितीला विविध प्रकारचे प्रयोग करून पर्यायी गुणवत्तेला संधी देता येणार आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेले श्रेयस अय्यर, मयंक आगरवाल अशा खेळाडूंनाही आपली गुणवत्ता आणि उपयुक्तता सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये आघाडीचा फलंदाज शिखर धवनवर सर्व काही अवलंबून राहणार आहे. अर्थात, के.एल. राहुल सध्या जबरदस्त फॉर्मात असल्याने त्याच्याकडूनही या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
झटपट क्रिकेटच्या मालिकेमध्ये कर्णधार विराट कोहली उपलब्ध असल्याने त्या मालिकेच्या यशाबाबत फारशी चिंता करण्याची काळजी नसली, तरी झटपट क्रिकेटनंतर जी कसोटी मालिका होणार आहे ती मात्र भारतासाठी निश्चितच आव्हानात्मक ठरणार आहे. क्रिकेट विश्वचषक जिंकण्याची दावेदारी ठेवायची असेल, तर भारताला या मालिकेमध्ये अधिक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात हरवून ऐतिहासिक विजय मिळवला असला, तरी आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. एक तर गेल्यावर्षी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे महत्त्वाचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संघात नव्हते. या दोन्ही फलंदाजांचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश झाल्याने ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मजबूत झाली आहे.
आयपीएल क्रिकेटच्या निमित्ताने डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि फिंच यांच्यासह सर्वच ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची आणि शैलीची माहिती झाली असल्याने त्याचाही त्यांना फायदा होणार आहे. अर्थात, ऑस्ट्रेलियासारख्या फास्ट खेळपट्टीवर भारताचे जसप्रीत बुमराह आणि महंमद शमी हे गुणी गोलंदाज निश्चितच चमत्कार घडवू शकतात. त्याशिवाय चहल आणि अश्विन हे फिरकी गोलंदाजही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चकवू शकतात. कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली जरी भारतीय संघात उपलब्ध नसला तरी त्याचा कोणताही मानसिक दबाव न घेता उर्वरित खेळाडूंनी जर आपल्या क्षमतेप्रमाणे खेळ केला तर ऑस्ट्रेलियासमोर निश्चितच आव्हान उभे राहू शकेल.
कोहली संघात नसल्यामुळे भारतीय संघ कमकुवत झाल्याचे मानसिक युद्ध सध्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून खेळले जात असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून इतर सर्व खेळाडूंनी आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. विराट आणि रोहितच्या अनुपस्थित होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करायची असेल, तर त्यापूर्वी होणाऱ्या झटपट क्रिकेट मालिकेमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली तर भारतीय संघाचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम कसोटी मालिकेवर होऊ शकेल.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत प्रथमच स्टेडियमवर प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार असल्याने ऑस्ट्रेलियात भारतीय चाहते मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचाही फायदा भारतीय संघाला होईल. भारतीय संघाचे हे “मिशन ऑस्ट्रेलिया’ केवळ भारतीय क्रिकेटसाठी नव्हे, तर जागतिक क्रिकेटसाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. क्रिकेटला चालना देण्याचे काम ही मालिका निश्चितच करणार आहे आणि नवीन वर्षात जागतिक क्रिकेट मोठ्या आत्मविश्वासाने सुरू राहण्याचे संकेतही मिळणार आहेत.