नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा भारताचा नेमबाजी संघ जाहीर झाला आहे. या संघात महाराष्ट्राच्या अव्वल महिला खेळाडू तेजस्वीनी सावंत व राही सरनोबत यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत यंदा इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच भारताचे इतके नेमबाज पात्र ठरले आहेत. देशाची अव्वल खेळाडू मनू भाकर हिच्याकडून पदकाची अपेक्षा जास्त आहे. नेमबाजीतील तीनहीप्रकारांत मनू सहभागी होणार आहे. त्यामुळे तिच्याकडूनच यंदा पदकाची अपेक्षा आहे. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या तेजस्वीनी सावंत आणि राही सरनोबत या देखील देशाला पदक मिळवून देतील असा विश्वास वाटत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत या तिन्ही खेळाडूंनी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेलया ईलाव्हेनिल व्हॅलारिव्हानने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. 10 मीटर एअर रायफल महिला गटात ईलाव्हेनिलने ऑलिम्पिक स्थाननिश्चिती केली नव्हती, परंतु ऑलिम्पिक पात्रता स्पर्धामधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर तिची निवड करण्यात आली आहे.
वैयक्तिक विभागात महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनूसह अनुभवी राहीवर भारताची मदार असेल, तर 10 मीटर पिस्तूल प्रकारात मनूसह यशस्वीनी सिंग देस्वालचा समावेश करण्यात आला आहे. अपूर्वी चंडेला फक्त महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात खेळणार आहे.
भारतीय संघ –दिव्यांश सिंग पनवार, दीपक कुमार, संजीव रजपूत, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर. सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, अपूर्वी चंडेला, ईलाव्हेनिल व्हॅलारिव्हान. अंजूम मुदगिल, तेजस्वीनी सावंत, यशस्वीनी सिंग देस्वाल, राही सरनोबत, मनू भाकर, अंगदवीर सिंग बाजवा, मैराज अहमद खान.