ब्रिस्बेन : ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या विजयाची साखळी आज भारताने तोडली आहे. याठिकाणी भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ गाडी राखून विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर.अश्विन यांनी संयमी फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघाने विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचं कठीण आव्हान पार केलं आहे.
अखेरच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर रोहित शर्मानं आपली विकेट फेकली. त्यानंतर शुबमन आणि पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत ११४ धावांची भागिदारी केली. गिलं ९१ धावांवर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि पुजारा यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजिंक्य रहाणे २४ धावांवर बाद झाला. अजिंक्य राहणेनंतर पुजाराही ५६ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतनं सामन्याची सर्व सुत्रं आपल्याकडे घेतली. पंतनं मयांकसोबत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोक्याच्या क्षणी मयांकनं (९) आपली विकेट फेकली. मयांकनंतर सुंदरनं झटपट काढल्या. मात्र विजयाच्या समीप पोहचल्यानंतर सुंदर(२२ ) आणि शार्दुल ठाकूर (२) यांनी विकेट फेकली. मात्र ऋषभ पंतने ८९ धावांची खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.