पुणे : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताचे अनेक खेळाडू जे एकामागून एक चमत्कार करत आहेत. दक्षिण आफ्रिकेपासून ते भारत आणि इंग्लंडपर्यंतच्या युवा खेळाडूंनी या स्पर्धेत एक एक करून आपले कौशल्य दाखवले आहे.
यामध्ये, भारताचा अष्टरपैलू राजवर्धन हंगरगेकर याचा देखील समावेश आहे.
राजवर्धनने गेल्या काही वर्षांत केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लवकरच भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघ शोधत असलेल्या अष्टपैलू खेळाडूचा शोध राजवर्धनच्या रुपाने संपू शकतो. या पार्श्वभूमीवर लेखातून भारताच्या अंडर-19 विश्वचषक संघाचा सदस्य राजवर्धन हंगरगेकर याच्याविषयी जाणून घेणार आहोत.
तुळजापूरमध्ये जन्म
राजवर्धन हंगरगेकर याचा जन्म 10 नोव्हेंबर 2002 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर येथे झाला. तो वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यास सक्षम आहे. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध 33 धावांची धडाकेबाज खेळी खेळून त्याने कपिल देव आणि हार्दिक पांड्याची आठवण करून दिली होती. काही चाहते त्याला कपिल देव म्हणू लागले आहेत. 1983 च्या विश्वचषकात कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावले होते, तशी फलंदाजी करण्याची ताकद हंगरगेकरच्यात आहे.
आयर्लंडविरुद्ध शानदार खेळी
सध्या सुरु असलेल्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात हंगरगेकरला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही, कारण संघाचे प्रमुख फलंदाज चांगली कामगिरी करत होते, परंतु आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार आणि उपकर्णधारासह अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आणि हंगरगेकरला वरती फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा उठवत त्याने 17 चेंडूत 39 धावा केल्या. या डावात त्याने षटकारांच्या हॅट्रीकसह पाच षटकार आणि एक चौकार लगावले.
गेल्या 2 वर्षात 800 षटके गोलंदाजी
राजवर्धन हंगरगेकर याचे प्रशिक्षक मोहन जाधव यांच्या म्हणण्यानुसार त्याचा रनअप एखाद्या स्प्रिंटर सारखा आहो. त्याच्या त्याफ्यात चांगला इनस्विंगर, यॉर्कर आणि चांगला बाउन्सरही आहे. यासोबतच त्याने आपल्या फलंदाजीतही सुधारणा केली आहे. त्याचवेळी त्याचा फिटनेस ट्रेनर तेजसने सांगितले की, गेल्या 2 वर्षांत राजवर्धनने नेटमध्ये 800 षटके गोेलंदाजी केली आहे वेगही चांगला राखला आहे.
संघाच्या फायद्यासाठी फिरकीपटू ते वेगवान गोलंदाज
राजवर्धन 140 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतो. विकेट टू विकेट गोलंदाजी हा त्याचा प्लस पॉइंट आहे आणि विकेट्स काढणे ही त्याची खासियत आहे. विशेष म्हणजे राजवर्धनने क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा तो ऑफस्पिनर होता. उस्मानाबाद जिल्ह्यातून अंडर-14 क्रिकेट खेळताना तो ऑफ-स्पिन गोलंदाजी करायचा, पण त्याचा संघ वेगवान गोलंदाज नसल्यामुळे झगडत होता. अशा स्थितीत राजवर्धनने संघाच्या गरजेनुसार वेगवान गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व
उदयोन्मुख अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकरने 16 जानेवारी 2021 रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये महाराष्ट्रासाठी टी20 मध्ये पदार्पण केले. तर 21 फेब्रुवारी 2021 रोजी विजय हजारे ट्रॉफी 2020-21 मध्ये महाराष्ट्रासाठी लिस्ट ए स्पर्धेत मध्ये पदार्पण केले. महाराष्ट्रासाठी केलेल्या दमदार कामगिरीनंतर त्याची विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली. महाराष्ट्राच्या मातीतून अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, अजित वाडेकर, रोहित शर्मा आणि सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
अष्टपैलू म्हणून टीम इंडियात मिळू शकते संधी
अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 19 वर्षीय राजवर्धनने 10व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत अवघ्या 20 चेंडूत 33 धावांची तुफानी खेळी केली. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने 10 षटकात 49 धावा देत एक विकेट घेतली. या सामन्यात जगाने त्याला प्रथमच 140 च्या वेगाने गोलंदाजी करताना पाहिले.
पाकिस्तानशिवाय यूएईविरुद्धच्या सामन्यातही त्याने अप्रतिम खेळ दाखवला. युएईविरुद्धच्या सामन्यात राजवर्धनला सहाव्या क्रमांकावर पाठवण्यात आले. संघाचा विश्वासा सार्थ ठरवत त्याने अवघ्या 23 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी केली.
इरफान पठाण, अजित आगरकर, हार्दिक पांड्या, हरभजन सिंग, रवींद्र जडेजा, युवराज सिंग असे अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात आले, पण भज्जी-युवी वगळता अन्य कोणीही प्रदीर्घ कारकीर्द घडवू शकले नाही. आता राजवर्धनची गोलंदाजी पाहून तो भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू गोलंदाजाचा दुष्काळ संपवू शकेल, अशी आशा लोकांना वाटत आहे.