पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) :- वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज (गुरूवार,दि.27) खेळला जाणार आहे. या मालिकेत भारत 2-0 ने आघाडीवर असून अखेरचा आणि तिसरा सामना जिंकत विंडीजला क्लीन स्वीप देण्याच्या उद्देशाने धवन सेना मैदानात उतरेल.
भारताने रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सलग 12व्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब करून विश्वविक्रम रचला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड शेवटच्या सामन्यात काही बदल करत नवीन खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे; परंतु संघ समतोल राखत विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असेल.
या एकदिवसीय मालिकेत युवा फलंदाज शुभमन गिलने पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघाला चांगली सुरुवात दिली. त्याच पद्धतीने तिसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. गिलने मालिकेतील पहिल्या सामन्यात 53 चेंडूत 64 धावांची खेळी केली होती. यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही 49 चेंडूत 43 धावा केल्या होत्या. यामुळे ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना श्रेयस अय्यरसाठीही खास ठरणार आहे. त्याने या मालिकेत खराब फॉर्म मागे सोडला असून पहिल्या दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. या दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले आहे. तसेच संजू सॅमसननेही दमदार खेळी करत आपले स्थान निश्चित केले आहे.
या एकदिवसीय मालिकेत शार्दुल ठाकूर भारतासाठी सर्वात महत्त्वाचा गोलंदाज ठरला आहे. उभय संघातील शेवटच्या सामन्यात देखील शार्दुल निर्णायक भूमिका पार पाडू शकतो. तसेच दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आवेश खानला संधि मिळाली होती, पण तोही फ्लॉप ठरला. अशा स्थितीत अर्शदीप सिंगला तिसऱ्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळू शकते. याशिवाय दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजचे खेळणे जवळपास निश्चित झालेले दिसते.
तथापि, यजुवेंद्र चहलला विश्रांती दिली जाऊ शकते. दुसरीकडे वेस्ट इंडिज संघात सक्षम खेळाडू आहेत; परंतु ते कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयशी ठरले ओहत. शाई होप, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल किंवा रोमॅरियो शेफर्ड यांच्या वैयक्तिक कामगिरीवर संघाचा विजय अवलंबून आहे.