-अमित डोंगरे
दारुण पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दिशा आणि टप्पा अचूक ठेवला व त्यासमोर आमची फलंदाजी अपयशी ठरली. एक गोष्ट समजली नाही हा जो काही योग्य टप्पा होता, त्यासमोर कशी फलंदाजी करायची हे भारताच्या अनुभवी फलंदाजांना त्यातही जगातील सर्वोत्तम फलंदाजांना समजले नाही.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात जास्त नाचक्की करणारा पराभव ठरला. यापूर्वी आपण 1974 साली इंग्लंडविरुद्ध 42 धावांवर डाव गडगडला होता. 9, 4, 2, 0, 4, 0, 8, 4, 0, 4, 1 हा कोणाचाही मोबाइल क्रमांक नसून भारतीय फलंदाजांनी केलेल्या धावा आहेत. जोश हेझलवूडने 5, तर पॅट कमिन्सने 4 गडी बाद केले. मोहम्मद शमी याला दुखापत झाल्याने तो जखमी निवृत्त झाला. 22 व्या षटकात भारताचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे केवळ 36 धावांत कोसळला. हे पाप कोणाचे, कोहलीचे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे की सर्व संघाचे.
निवड समितीला तरी याचे समर्थन करता येईल का. भारतीय क्रिकेटमधीलच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील रनमशिन असे संबोधला जात असलेला कोहली ज्या पद्धतीने ऑन द राईज खेळला त्यावरून हा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता की गल्ली क्रिकेट हेच समजेनासे झाले होते. संघातील एकाही फलंदाजाला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. पहिल्या दिवशी जिगरबाज फलंदाजी केल्यावर समाधानकारक धावसंख्या उभारली व आपल्या गोलंदाजांनीही भेदक गोलंदाजी करत यजमान संघाला 191 धावांत रोखले. यावेळी भारताकडे 53 धावांची आघाडी होती. मात्र, या सामन्यावर वर्चस्व गाजवणे तर सोडाच पाच दिवसांचा सामना आपल्याच कर्तृत्वाने तिसऱ्याच दिवशी संपला.
अडलेड ओव्हलची खेळपट्टी भूत बनली आणि भारतीय फलंदाजांना त्याची बाधाही झाली. 36 धावा संपूर्ण संघाने केल्या. मात्र, त्यासाठी 22 षटके खेळली. म्हणजे खेळपट्टीवर काही काळ उभे राहता येत होते. मयंक आग्रवालने 9 धावांसाठी 40, हनुमा विहारीने 8 धावांसाठी 22 चेंडू खेळले. इतकेच काय जसप्रीत बुमराहने शुक्रवारी नाइट वॉचमन म्हणून फलंदाजी करण्यासाठी आल्यावर 2 धावा केल्या व त्यासाठी 17 चेंडू खेळले. जर खेळपट्टीवर केवळ उभे राहूनही विकेट टिकवता येते तर मग बाकीच्यांनी इतकी हाराकिरी करण्याची गरज काय होती.
चेंडू स्विंग होत होता, पण हेझलवूड व कमिन्स हे वसीम अक्रम किंवा वकार युनुस नव्हते. कोहली, पुजारा, रहाणे, अग्रवाल, साहा व विहारी असे सहा फलंदाज अपयशी ठरतात म्हणजे कोणत्याही फलंदाजाला जबाबदारी काय असते हे तरी समजते का, हा प्रश्न निर्माण होत आहे. या कसोटीसाठी भरात असलेल्या लोकेश राहुलला बाहेर ठेवून कोहलीने काय साधले. पृथ्वी शॉ याच्या अपयशावरही बोलण्यात काही अर्थ उरलेला नाही.
आज कांगारूंनी चक्क वाघांची शिकार केली. या सामन्यात गोलंदाजांनी सरस कामगिरी केली तर फलंदाजांनी नांगी टाकली. दिवस-रात्र कसोटी सामन्यात ही कामगिरी असेल तर उर्वरित तीन कसोटीत आपण काय दिवे लावणार हे लक्षात येते. यातूनही फिनिक्ससारखी भरारी घेता येईल पण कावळ्याला गरुडाचे पंख लावून आकाश काबीज करता येत नाही.