IND vs NZ – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या सुरवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर १०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताच्या सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर लवकर बाद होण्याची कोणतीही संधी दिली नाही. भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने चमकदार कामगिरी केली. तर फलंदाजीत रोहित आणि शुभमन यांनी चांगली खेळी केली.
सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहुण्या न्यूझीलंड संघाची फलंदाजी ढेपाळली. भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाला प्रभावी खेळी करता आलेली नाही. भारतीय संघाने श्रीलंकानंतर आता न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या दोन्ही मालिकांमध्ये भारताच्या गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही बाजूने चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आहे.
आजच्या सामन्यात न्यूझीलंडला फक्त १०८ धावाच उभा करता आल्या. ग्लेन फिलीप्सने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त मागील सामन्यातील शतकवीर मायकल ब्रेसवेल २२ तर मिचेल सँटनरने २७ धावांची खेळी केली. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकड्यातही धावा करता आल्या नाही. त्यामुळे या महत्वाच्या एकदिवसीय सामन्यात भारताला १०९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ३ गडी बाद केले. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तसेच सिराज, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली कामगिरी केली. रोहितने अर्धशतकीय खेळी करत ५० चेंडूत ५१ धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर विराट कोहली ११ धावा करून बाद झाला. शुभमन गिलने ५३ चेंडूत ४० धावांची खेळी केली. तर ईशान किशनने ८ धावांचे योगदान दिले. भारताने ३ सामन्याच्या मालिकेत २-०ने विजयी आघाडी घेतली आहे.