मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तंत्रज्ञान राबविणे तसेच त्यात माहीतगार होणे याबाबत आपण अद्याप ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यापेक्षा खूपच मागे आहोत, असे मत भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने व्यक्त केले आहे.
खेळात आता बदल झाले आहेत. नवनवे तंत्रज्ञान आले आहे. त्याचा खुबीने वापर करण्याची हतोटी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संघाकडे आहे, मात्र आपण त्यात कमी पडत आहोत. खेळण्याचे तंत्र आपले भक्कम असले तरी तंत्रज्ञानाच्या वापरात आपण मागे पडलो आहोत, असे तीने सांगितले.
संघ गेल्या दीड वर्षांत सातत्याने सरस कामगिरी करत आहे. त्याला प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफही चांगले मार्गदर्शन करत आहे. विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यात जरी अपयश आले असले तरीही आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध करण्यात कमी पडलो नाही. झालेल्या चुका दुरुस्त करून आम्ही विश्वकरंडक निश्चितच देशात आणू, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
खेळाडूसाठी त्याचा खेळ, तंत्र आणि तंदुरुस्ती महत्त्वाची असते मात्र, याबाबत जागरुकता यायला आपल्याला खूपच उशीर झाला. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संघाची तंदुरुस्ती पाहता त्यांच्या दर्जाची बरोबरी करण्यात आपण कमी पडलेलो आहोत. खेळाडूंनी केवळ सरावावर भर दिला त्या अनुषंगाने येत असलेल्या अनेक गोष्टींकडे लक्षच दिले नाही. मात्र, आता येत्या काळात जे काही आवश्यक आहे त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असेही हरमन म्हणाली.
आम्ही तंदुरुस्तीबरोबरच प्रशिक्षणावरही आता भर देत आहोत, पण गेल्या दोन वर्षांत जे इंग्लंड व ऑस्ट्रेलियाने मिळवले ते मिळविण्यात आपल्याला उशीर झाला. खेळ सरस असला तरीही तंदुरुस्तीही तितकीच महत्त्वाची आहे हे आता खेळाडूंना पटले आहे, असेही स्पष्टीकरण तिने दिले.
येत्या काळात भारतीय महिला संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. त्यापूर्वी आम्हाला तंदुरुस्तीशी निगडित काही गोष्टी सोडवाव्या लागणार आहेत. तेथील वातावरण हेच जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. संघातील सर्व खेळाडू आता करोनाचा धोका संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा अत्यंत गांभीर्याने सराव सुरू करतील व त्या मालिकेत आम्ही निश्चितच यशस्वी कामगिरी करू, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
गोलंदाजीत विविधता पाहिजे….
भारताच्या महिला संघाची ताकद फिरकी गोलंदाजी आहे. मात्र, येत्या काळात केवळ फिरकी गोलंदाजीवर अवलंबून राहण्यापेक्षा मध्यमगती तसेच वेगवान गोलंदाजी देखील भेदक पाहिजे. त्यासाठी त्यावर मेहनत घ्यायला हवी, असेही हरमन म्हणाली.