मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि खासदार प्रीतम मुंडे यांचं नावही मंत्रीपदासाठी चर्चेत होतं. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. यावरून मुंडे भगिणी नाराज असल्याचं बोललं जात होतं. यावर आता पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आम्ही कुठेही नाराज नाही. पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे. पक्षाचा निर्णय पटलेला आहे. अशा शब्दात केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चेला पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. यावेळी त्यांनी टीम नरेंद्र, टीम देवेंद्र हे भाजपला मान्य नाही, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष त्यानंतर मी असं धोरण आहे. ‘मी’पणा भाजपात नाही. आम्ही, आपण ही संस्कृती भाजपात आहे. भाजपाच्या संस्कृतीला मानणारी मी पक्षाची सामान्य कार्यकर्ता आहे. वेळोवेळी मी हे सांगितले आहे.
पक्षनिष्ठा माझ्या बापाने मला दिली आहे. राज्यात मुंडे-महाजन नेतृत्व करत होते तेव्हा तळागळातील लोकांना एकत्र आणून मुंडे साहेबांनी लोकांना संधी दिली आहे असं पंकजा मुंडेंनी सांगितले.
भाजपमध्ये निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असतं. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असं होतं. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, त्यांचं काम चांगलं आहे.
सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य आहे. मी छोटीशी कार्यकर्ता आहे. त्यामुळे पंतप्रधानाकडून मला संपवण्याचा प्रयत्न होईल, हे शक्य नाही , असंही त्या म्हणाल्या.