अयोध्या- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम जन्मभूमी-बाबरी मशीदचा वाद मिटला असून श्री रामजन्मभूमी येथे मंदिर उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊननंतर या जागेचे सपाटीकरण करण्यात आले होते. कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचं काम आता आणखी वेगाने सुरु आहे.
राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 65 टक्के काम पूर्ण झालं असून, मंदिर उभारण्यासाठी देशभरातील लाखो राम भक्त पुढे सरसावले आहे.
‘रामलला’ मंदिरात विराजमान होण्याची रामभक्त मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. देशातील सर्वच राज्यांनी या भव्य मंदिर उभारणीकरता आपले योगदान दिलं आहे. महाराष्ट्रातून देखील मंदिरासाठी लागणारे 1800 क्यूबिक मीटर लाकूड अयोध्येला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार सागवान मंदिराच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. 29 मार्चला भव्य शोभायात्रेसह लाकडाची पहिली खेप अयोध्येला जाणार आहे.
मंदिराचा मुख्य दरवाजा आणि इतर कोरीव लाकडी बांधकामासाठी लाकडाची आश्यकता आहे. त्यासाठी 1800 क्यूबिक मीटर लाकूड अयोध्येला पाठवले जाणार आहे. भव्य शोभा यात्रेसह विविध ठिकाणी विधिवत पूजा करून ही खेप पाठवण्यात येणार आहे., अशी माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यामुळे राम मंदिर उभारणीच्या कामाला महाराष्ट्राचा देखील मोठा हातभार लागणार असल्याचे दिसून येत आहे.