पुणे(प्रतिनिधी) – राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना राज्य शासनाने 15 जून पासून शाळा सुरु करण्याचा हट्ट धरला आहे. या हट्टापायी शासनाने विद्यार्थी, शिक्षक यांचा जीव धोक्यात घालू नये, असे म्हणत शिक्षक क्रांती संघटनेसह इतर संघटनांनी शाळा लवकर सुरु करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रसार होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा, महाविद्यालये मार्च महिन्यापासून बंदच ठेवण्यात आली आहेत. मुंबईत एका शाळेतील विद्यार्थ्याला करोनाची लागण झाल्याने शासनाने डोळे उघडले होते. त्यानंतर दहावीच्या भूगोलाच्या पेपरची परीक्षा रद्द करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाचे संघटनांकडून त्यावेळी स्वागतच करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊनही वाढत आहे. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा 15 जूनलाच सुरु करण्याचे वारंवार स्पष्ट संकेत दिले आहेत. सुरुवातीला ऑनलाईन वर्ग चालविण्याचे नियोजनही सुरु करण्यात आले आहे. मात्र याला आता शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांच्याकडूनच विरोध होऊ लागलेला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा कोणताही विचार न घेता शिक्षण विभाग शाळा सुरू करण्याची एवढी घाई का करतेय असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे.
शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिरसाट यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना निवेदनही पाठविले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा.संतोष फाजगे, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनीही शाळा व कनिष्ठ महाविद्यालये लवकर सुरु करण्याचा विरोध दर्शविला आहे.
राज्यातील मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवसे बिकट होऊ लागली आहे. शिक्षकांना काम करुनही नियमित वेतन मिळत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागणार आहे. केवळ राजकीय पुढारी, उद्योजक, व्यापारी या धनदांडग्यांच्या इंग्रजी शाळांच्या आग्रहामुळे राज्यातील सर्वच शाळा 15 जूनपासून सुरु करणे योग्य ठरणार नाही. लवकर शाळा सुरु करुन पालकांकडून भरमसाठी फी वसूलीचा तगादा लावायचा हाच कार्यक्रम या इंग्रजी शाळांना राबवायचा आहे. त्यासाठी शाळा लवकर सुरू करुन विद्यार्थ्यांना मरणाच्या दारात ढकलायचे आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे. कोणीही आर्थिक राजकारण करु नये व विद्यार्थ्यांच्या जीवांशी खेळू नये. शासनाने विद्यार्थीहीत लक्षात घेऊन करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच शाळा सुरु करण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. – संभाजी शिरसाट, अध्यक्ष, शिक्षक क्रांती संघटना