दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन
मंचर- शिक्षकांनी चांगले निकाल लावले याचे कौतुक करण्याबरोबरच मागे पडणारे, शिक्षणातून गळणारे विद्यार्थी यांच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. हुशार विद्यार्थ्यांबाबत बोलले जाते, परंतु मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत कोणी विचार करीत नाही, अशी खंत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे व डी. जी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप वळसे पाटील बोलत होते. कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय कळमकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, सुभाष मोरमारे, कैलास काळे, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, अक्षय काळे, अजित काळे, जयसिंग काळे, सखाराम पाटील काळे, प्रकाश घोलप, संजय गवारी, सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, प्राचार्य नानासाहेब गायकवाड, बी. डी. चव्हाण, रामभाऊ सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, आज शंभर मुले पहिलीमध्ये प्रवेश घेत असतील तर वीस विद्यार्थी पदवीपर्यंत पोहोचतात. बाकीच्या विद्यार्थ्यांचे काय झाले याची दखल कोणी घेत नाही. आज विद्यापीठांमध्ये पन्नास टक्के शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत व पदवीधर झालेले हजारो विद्यार्थी बेरोजगार आहेत. हे असंतुलन कमी झाले पाहिजे. शिक्षकांची वर्गातील, शाळेतील कामगिरी जेवढी महत्वाची आहे. तेवढीच समाजात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर प्रखर भूमिका मांडण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. प्राचार्य आय. बी. जाधव, तनुजा पिंगळे, सुरेश लोहकरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल वळसे पाटील यांनी केले.