अनुदानित उच्च माध्यमिक वाढीव पदांना मंजुरी द्या; अन्यथा आंदोलन तीव्र करणार
शिक्रापूर – वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाने मंजूर न केल्याने विविध मागण्यांसाठी आज पुन्हा आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उतरले आहेत. महासंघाने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात आपल्या मागण्या लवकर पूर्ण होण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या चारूशिला चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात वाढीव प्रस्तावित पदांना त्वरित मंजूरी व नेमणूक दिनांकापासून वेतन मिळावे, आयटी शिक्षकांना अनुदान देऊन त्वरित वेतन मिळावे. या मागण्या करण्यात आल्या. हे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष विलास जाधव आंधळकर, सचिव संजय शिंदे, प्रा. सुरेश अहिरे, सुनील पूर्णपात्रे, विलास खोपकर, शिवाजी जगताप, सुनील बैसाणे यांच्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यातील तसेच राज्यातील पायाभूत पदांवरील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पायाभूत पदांवरील शिक्षक हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून विनावेतन काम करत असूनही वारंवार आंदोलन करावे लागत आहे. ही एक शोकांतिका असून यांना न्याय मिळालाच हवा असे प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. शिक्षण विभागाला सात हजार कोटी रुपये अनुदान अर्थ विभागाने दिले असूनसुद्धा पायाभूत पदांवरील शिक्षकांना वेतन का देण्यात येत नाही हा एक चर्चेचा विषय बनला असून या शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे असे प्रा. सुरेश अहिरे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी पायाभूत पदांना मान्यता मिळायलाच पाहिजे, आवाज कुणाचा पायाभूत शिक्षकांचा अशा घोषणा दिल्या.
पायाभूत पदांवरील शिक्षकांना वेतन मिळणे गरजेचे असून आता त्यांना न्याय मिळायला पाहिजे तसेच मंत्रालयात तांत्रिक अडचणींमुळे सामना करावा लागत असून जर शासनाने या पदांवरील शिक्षकांना वेतन सहित मान्यता नाही दिल्या तर संघटना तीव्र आंदोलन करेल आणि त्यांचे परिणाम शासनाने भोगावे लागतील.
-प्रा. संजय शिंदे, आंदोलक शिक्षक.