पुणे – राज्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान, शाळांमध्ये आवश्यकता असेल तरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलवावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनाच घ्यावा लागणार आहे.
राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश शासनाने बजावले आहेत. मात्र, काही शाळा, महाविद्यालयांत शिक्षक व कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येत असल्याचे उघड होऊ लागले आहे. कोणती ना कोणती कारणे सांगून त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समजले आहे.
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे काही संघटनांनी निवेदन देऊन काही मागण्या केल्या आहेत. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी शासनाकडून अंतिम आदेश मागविले आहेत. इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा, आरटीई प्रवेश व इतर आवश्यक काम आल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलविण्यात यावे. सरसकट सर्वांनाच बोलाविण्याची आवश्यकता नाही, असे शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी स्पष्ट केले.