विनाकारण येउ नका; आदेशच काढला
पुणे – जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सतत विनाकारण चकरा मारून अडथळा निर्माण करू नये, असे आदेशच शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना बजाविले आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात शाळांच्या विविध कामाबाबतच्या फायली मान्यतेसाठी दाखल करण्यात येतात. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कार्यालयात सतत गर्दी होत असते. यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढू लागली आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बोलाविले आहे असे सांगून विविध शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वारंवार शिक्षणाधिकारी कार्यालयात शिरकाव करत असतात. त्यानंतर कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती विचारत बसल्याने कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे प्रकार अनेकदा घडत आहेत. शिक्षण विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून पत्र अथवा फोन आल्याशिवाय कोणालाही कार्यालयात पाठवू नये, अनावश्यक शिक्षक व कर्मचारी स्वत:च्या कामाशिवाय कार्यालयात आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांवर राहणार आहे, असा इशारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.