– प्रवीण गायकवाड
टाकळी हाजी – आज 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. याच दिवशी आपल्या राष्ट्राला दिशा देणारे एक महान व्यक्तिमत्त्व लाभले. सन 1962 ते 1967 या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविले. ते एक महान मार्गदर्शक व तत्वज्ञ होऊन गेले, अशी या महान नेत्याचा नव्हे गुरुंचा जन्मदिवस आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो हे सर्व शिक्षकांचे भाग्यच समजावे लागेल.
आज जगात भारत देश महासत्ता होत असताना देशातील प्रत्येक क्षेत्र प्रगती पथावर आहे. आर्थिक, संरक्षण, भौगोलिक, सामाजिक, नैतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक इ. सर्वच. यातील शेवटचा म्हणजे शैक्षणिक क्षेत्राचा मुद्दा महत्त्वाचा, कारण तो इतर क्षेत्रांचा पाया होय. देशातील प्रत्येक व्यक्ती शिक्षणाशिवाय स्वतःचे पर्यायाने देशाचे भवितव्य घडवू शकत नाही. मग ते शिक्षण औपचारिक असेल वा अनौपचारिक.
हे शिक्षण देणारा गुरु होय. हेच ज्ञानदानाचे पवित्र कार्य सर्व शाळांमधील शिक्षक आज करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्ये संस्कारित करुन त्यांना जीवन जगण्यासाठी समर्थ करणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे व ही जबाबदारी आजचे शिक्षक समर्थपणे पेलत आहेत. म्हणूनच देशाला मिळालेली सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, बाबा आमटे, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम ही अनमोल रत्ने आज आपली आदर्श आहेत.
किती भूमिका पार पाडाव्यात?
शालेय कामकाज पार पाडत असताना विशेषतः प्राथमिक स्तरावर शिक्षकांना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. शालेय बांधकाम असताना तो इंजिनियर बनतो. शाळेची ऑनलाइन माहिती भरताना तो संगणकतज्ञ बनतो. शालेय पोषण आहाराचे अपडेट ठेवताना कूक व्यवस्थापक बनतो, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना तो डॉक्टर बनतो. पालकांचे प्रबोधन करताना तो समुपदेशक बनतो, तर विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवताना तो विशेष शिक्षक असतो. याशिवाय गायक, वादक, निवेदक, खेळाडू, कार्यक्रम व्यवस्थापक या भूमिकाही तो पार पाडतो. विद्यार्थ्यांच्या कुवतीप्रमाणे शिकवताना तो बालमानसशास्त्रज्ञ असतो तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देताना तो दिग्दर्शक बनतो व शेवटी तयार झालेल्या विद्यार्थीरुपी सुंदर कलाकृतीचा तो निर्माता व शिल्पकार बनतो. या सर्व भूमिका निभावताना त्यातील पायाभूत नियमांची माहिती शिक्षकाला ठेवावीच लागते व त्यामुळेच आजचा शिक्षक समाजासाठी एक दिशादर्शक ठरत आहे.
देशाची भावी पिढी तयार करत असताना सर्वांगीण शिक्षण देऊन, बदलती शिक्षण पद्धतीचा अवलंब करून शिक्षक ज्ञान दानाचे पवित्र काम करत आहे. शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजनांना वंदन.
-अनिल पलांडे, राष्ट्रपती पारितोषक विजेते शिक्षक
शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना समाजाने शिक्षकांना आदराचे स्थान देऊन प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, हीच शुभेच्छा आजच्या शिक्षक दिनी महत्वाची ठरेल.
-शिवाजी वाळके, जिल्हा शिक्षक नेते
आजच्या युगात शिक्षकांचे महत्त्व पूर्वीच्या काळातील शिक्षकांचे इतकेच असून विज्ञान युगात आधुनिक विचारांचा वारसा घेऊन देशासाठी आदर्श नागरिक घडवण्यात खूप मोठा वाटा शिक्षकाचा आहे.
-राजेसाहेब लोंढे, गटशिक्षण अधिकारी शिरूर
काळ बदलल्याने सामाजिक गरजाही बदलल्या आहेत. म्हणूनच अभ्यासक्रम, शैक्षणिक ध्येये, शैक्षणिक आकृतिबंध यामध्येही बदल केला जात आहे. पिढीनुरुप शैक्षणिक मतप्रवाह बदलत आहेत. शिक्षकांना नवनवीन येणारी सेवांतर्गत प्रशिक्षणे, शैक्षणिक, मासिके, प्रसारमाध्यमे, वरिष्ठांची प्रेरणादायी व्याख्याने व मार्गदर्शन, चर्चासत्रे यांचा फायदा होत आहे.
-वर्षाराणी गोगावले, उपशिक्षिका जि. प. वढू पुनर्वसन शिरूर