पवनानगर -करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. सर्वच विद्यार्थी या ऑनलाइन प्रवाहात नसल्याने नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलच्या वतीने एक नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. “शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम राबवत पवनमावळातील धालेवाडी, मालेवाडी, आंबेगाव, तिकोणा पेठ सारख्या दुर्गम भागात शिक्षक विद्यार्थ्यांच्या गावात जाऊन ज्ञानदानाचे कार्य सुरू केले आहे.
करोनामुळे विद्यार्थी व शिक्षक भेटू शकत नव्हते. गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शाळा चालू होती; परंतु आता ऑनलाइन वर्गाचा देखील मुलांना कंटाळा आला आहे. त्यातच पवनानगर हा भाग ग्रामीण भाग असल्याने “नेटवर्क’ची समस्या त्यातच काही पालकांची बेताची परिस्थिती मुलं देखील मालेवाडी, धालेवाडी अशा डोंगराच्या पायथ्याशी असल्याने अनेक मुलांचा शाळेशी संबध तुटला होता.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या निदर्शनास ही बाब आली. विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही; परंतु शिक्षक त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवू शकतो. या संकल्पनेतून व पवनानगर येथील पवना विद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते आठवी वर्गांना शिकविणारे शिक्षक शाळेच्या परिसरातील गावात तसेच दुर्गम असणार वाड्या-वस्त्यांवर जाऊन मंदिर व मोकळ्या जागेत करोनाचे नियम पाळत विद्यार्थांना एकत्र करत “शिक्षक आपल्या दारी’ उपक्रमाची सुरवात करत विद्यार्थांना शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात केली आहे.
संस्था आणि शिक्षकांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शिक्षक आपल्या गावात आपल्याला शिकवण्यासाठी आले आहेत, हे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील वेगळाच आनंद दिसून येत होता. तसेच संस्थेची व शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी करत असलेली धडपड पाहून पालक देखील या उपक्रमाचे कौतुक करीत आहेत.
संस्थेचे सचिव व पवना शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पवना शिक्षण संकुलाच्या प्राचार्या अंजली दौंडे, पर्यवेक्षिका नीला केसकर शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत होत आहे.
करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे त्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी हा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे. ग्रामीण भागातील पवना शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना वाड्या-वस्त्यांवर जाऊन ज्ञानदानाचे काम करीत आहेत. हा प्रयोग संस्थेतील अन्य शाळेत राबविण्यात येणार आहे.
– संतोष खांडगे, संस्था सचिव व अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती.