70 हजार उमेदवारांकडून प्राधान्यक्रम डाऊनलोड
पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी उमेदवारांना मंगळवार (दि.25) पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी 3 हजार उमेदवारांनी शाळांचे प्राधान्यक्रम भरून ते लॉकही करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
गेल्या आठ वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरती बंद ठेवण्यात आली होती. मागील वर्षी भरतीवरील बंदी उठविण्यात आली. यासाठी पवित्र पोर्टलवर 1 लाख 21 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील 12 हजार शिक्षकांची रिक्त पदे पोर्टलद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे काही दिवस पोर्टल बंदच ठेवण्यात आले होते. तांत्रिक अडचणी दूर करून ते पुन्हा सुरू झाले आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिक्षक भरती पारदर्शकपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर काम सुरू ठेवले आहे. ते स्वत: एनआयसीत उपस्थित राहून नियमित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत.
उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम डाऊनलोड करण्यासाठी 20 ते 24 जूनपर्यंत मुदत दिली होती. यासाठी वेळापत्रकच पोर्टलवर जाहीर केले होते. या मुदतीत 70 हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम डाऊनलोड केले आहेत. वैयक्तिक व अन्य काही कारणाने प्राधान्यक्रम डाऊनलोड करता न आलेल्या उमेदवारांना 30 जूनपर्यंत प्राधान्यक्रम डाऊनलोडची संधी आहे. मुदतीनंतर कोणत्याही कारणासाठी उमेदवारांना पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. आता पोर्टलवर प्रत्यक्षात प्राधान्यक्रम नोंदविण्यास सुरुवात झाली आहे.
एकाही उमेदवारावर अन्याय होणार नाही
प्राधान्यक्रम भरताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास उमेदवारांनी संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेत एकाही उमेदवारावर अन्याय होणार नाही याची गांभीर्याने दखल घेण्यात येणार आहे. सर्व भरती शासनाच्या आदेशाप्रमाणे व नियमाप्रमाणेच राबविण्यात येणार आहे, असे सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे.
30may pasun maz log in hot naiye, roj chkra marlya ajun nai zal, ksla ha prakar, mi self certified kelela aahe, Mazyakde purava aahe, KY krayche ata