शिवसेनेची सामनातून केंद्र सरकारला आव्हान
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेने थेट मोदी सरकारलाच आव्हान दिले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तुकडे-तुकडे गॅंगवर भाजपाचा रोष आहे. देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा पाकव्याप्त कश्मीरसंर्दभात लष्कराला आदेश देऊन धडा शिकवा, हाच उत्तम मार्ग आहे,असे शिवसेनेने म्हटले आहे.
जेएनयूतील विद्यापीठात झालेल्या हल्ल्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाच्या काही मंत्र्यांनी तुकडे-तुकडे गॅंग याला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. हा वाद सुरू असतानाच देशाचे नवे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे केंद्र सरकारने आदेश दिले, तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ असे म्हटले होते. या दोन्ही घटनांवरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका केली आहे. भाजपचे केंद्र सरकार हिमतीचे व हिकमतीचे आहे हे सिद्ध होईल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तुकडे-तुकडे गॅंगवर त्यांचा रोष आहे. देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा तुकडे-तुकडे गॅंगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे व त्यालाच आम्ही देशभक्ती म्हणतो.
जनरल नरवणे यांनी त्याच दिशेने पाऊल टाकण्यासाठी केंद्राकडे आदेश मागितले आहेत. हिंदुस्थानचे लष्कर हे संविधानात्मक मूल्यांचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आमचे लष्कर कटिबद्ध आहे. नैतिकता, नियम व संकेत पाळणे हे आमच्या लष्कराचे कर्तव्यच आहे. पाकिस्तानी लष्कराप्रमाणे घुसखोरी करणे हा आमच्या लष्कराचा पुरुषार्थ नाही. देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. तुकडे तुकडे गॅंगला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे!, असे शिवसेनेने म्हटले आहे.